कर्ता मुलाच्या मृत्यूनंतर आठ दिवसातच वडिलांनीही सोडले प्राण
वडील आणि मुलगा गेल्याने सर्वत्र एकच हळहळ

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कळंबू येथील प्रगतशील शेतकरी संजय आत्माराम बोरसे (वय ५८) ३१ जुलै रोजी दुपारी शेतातून घरी आल्यावर, घरातील पाण्याची मोटार चालू करताना विजेचा जबर शॉक लागून बाजूला फेकले जाऊन बेशुद्ध पडले. त्यांना कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पुढील उपचारासाठी शहादा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. १ ऑगस्ट रोजी कळंबू गावात संजय बोरसे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.
घरात वृध्द आई वडील असताना कर्ता पुरुष गेल्याने आई वडिलांना धक्का बसला. आई वडील हयात असताना मोठ्या मुलाचे निधन झाल्याने विरह सहन न झाल्याने वडील आत्माराम ओंकार बोरसे (वय ८५) यांनी अन्न, पानी सोडले मुलाच्या मृत्यूआधी त्यांची प्रकृती चांगली होती. अखेर त्यांनी ८ ऑगस्ट रोजी मुलाच्या वीरहाने त्यांनी प्राण सोडला. संजय बोरसे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी होता. मात्र, दशक्रियाविधी आधीच वडिलांनी प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आठ दिवसातच बाप आणि मुलाचा मृत्यू झाला. मुलगा आणि वडील दोघांचे एकाच दिवशी विधी करण्यात आल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.



