
कल्याण : बदलापूर रेल रोको आणि आंदोलन प्रकरणात जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड, तसेच पोलिसांवर दगडफेक यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या ३२ आंदोलनकर्त्यांना आज कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले. काल रात्री उशिरा, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात ३०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा कल्याण न्यायालयाने निर्णय घेतला आहे.
या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमुळे रेल्वे प्रवास आणि परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू ठेवला असून, आंदोलनातील इतर सहभागींचा शोध घेतला जात आहे.
बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी आंदोलन केलं होतं. सकाळी सहा वाजताच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि ते रेल्वे रुळांवर उतरले. रेल्वे स्थानकातील प्रवाशांनीही आंदोलनात उडी घेतल्याने याची तीव्रता वाढली.
पोलिस प्रशासनाकडून समजूत घालण्याचा आणि काहीसा बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले. प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आंदोलन सुरु राहिलं. अखेर पोलिसांनी आक्रमक रूप धारण करत आंदोलकांवर बळाचा वापर केल्यावर दहा तासांनंतर रेल्वे मार्ग मोकळा केला.
बदलापूर शहरात लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणी वातावरण तापले असताना आणि शाळेबाहेर आंदोलन होणार असल्याची कल्पना असूनही आंदोलन हिंसक होईल याची कल्पना पोलिसांना नसल्याचे समोर आले आहे; तसेच आंदोलनासंदर्भातील सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत असतानाही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांना न जुमानता आंदोलकांनी शाळेचे प्रवेशद्वार ओलांडून शाळेत प्रवेश केला. तोडफोड करताना काही आंदोलकांच्या हातात ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे पालक आणि सर्वसामान्य जनसमुदायामध्ये घातपाताचाही धोका संभवत होता. ज्वलनशील पदार्थ घेऊन आंदोलन पेटवणारे ते कोण होते, असा प्रश्न उपस्थित झाला होता.


