
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज दि.६ ऑगस्ट रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य आसुड महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांनी केले. यावेळी घोषणांणी परिसर दणाणून गेला होता.
कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ठिय्या देत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास छावा संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शेतकरी आसुड महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांनी यावेळी दिला.
या मोर्चात शेतकऱ्यांची सरसकट पाच लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्यांची पघकविम्यासाठी भरलेली रक्कम तत्काळ खात्यावर जमा करण्यात यावी, भ्रष्टाचार त्वरित थांबविण्यात यावा, खाजगी कोचिंग क्लासेसवर शासनाने निर्बंध आणावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वितरणासाठी सर्व बँकांना आदेशित करावे, संतांची भूमी असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ येथील कला केंद्राचा परवाना रद्द करून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, वैजापूर तालुक्यातील झालेल्या अनेक बोगस रस्त्यांच्या कामाची चौकशी करा यांसह इतर विविध मागण्या विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन करण्यात आल्या.
यावेळी विशाल विराळे, जालिंदर एरंडे, मनोहर सनेर, अमोल काळे, किशोर सदावर्ते, विवेक वाकोडे, साईनाथ कर्डीले, अर्जुन खराद, अभिजित ओटे, किशोर मगर, प्रशांत खंडागळे, मच्छिंद्र उबाळे, अंकुश निकम, अजय मोटे, नानासाहेब पाचपुते, धनंजय चिरेकर, राजेंद्र चव्हाण, आप्पासाहेब गिरगे, शिवाजी मोरे आदींची उपस्थिती होती. या मोर्चात ग्रामीण भागातून शेकडो शेतकरी, छावाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



