भिवंडी : आज (ता. 29 जानेवारी) मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडीत असलेल्या पडघा टोलनाक्याजवळ सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. मात्र, या अपघातात कोणालाही कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु, या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील बिलोली येथील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची आज सहल आयोजित करण्यात आली होती. ही सहल ठाण्यातील टीकुजिनी वाडी येथे जाणार होती. सहलीसाठी दोन बसेस करण्यात आल्या होत्या. या दोन्ही बसेसमधून आज सकाळी विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि शिक्षण ठाण्याच्या दिशेने निघाले. पण सकाळी ही बस भिवंडी तालुक्यातील पडघा टोलनाक्याजवळ आली असता बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ज्यानंतर ही बस थेट पुढे असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात बसची समोरील काच फुटली आणि बसचे मोठे नुकसान झाले.
या बसचा अपघात होताच टोलनाका परिसरात असलेल्या नागरिकांनी बसच्या दिशेने धाव घेतली. पण सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, हे पाहताच नागरिकांच्या जीवात जीव आला. या बसमधून एकूण 55 विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघाताची माहिती तत्काळ पडघा पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर काही पडघा पोलीस घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले. तर, या घटनेची नोंद पडघा पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.



