महाराष्ट्रमुख्य बातमी

Maharashtra Rain Update | पुण्यासह राज्यात पावसाची विश्रांती; मुंबईत शाळा सुरु होणार

रेड अलर्टमुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा बंद

राज्यात गेल्या आठवड्यापासून सर्वत्र पाऊस सुरु होता. परंतु गुरुवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजवला. पुणे जिल्ह्यात पावसामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमला बोलवावे लागले होते. आता शुक्रवारी सकाळी परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. पावसाने विश्रांती घेतली असून अनेक भागांतील पाणी ओसरले आहे. पुण्यात गुरुवारी एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतील शाळा, महाविद्यालये आज सुरु राहणार आहे. परंतु पुण्यासह आठ ठिकाणी सुट्टी असणार आहे.

राज्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये शुक्रवारी बंद राहणार आहे. त्यात ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा समावेश आहे.

पुण्यात पुन्हा रेड अलर्ट

पुण्यातील डेक्कन परिसरात पुलाची वाडी येथे शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. कात्रज तलावात बुडून दोघांचा तर तामिनी घाटात एक एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच इंद्रायणी नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील माती गणपतीजवळ वडापाव विकणारा तरुण पाण्यात पोहण्यासाठी गेला असता वाहून गेला. दिनेश असे या तरुणाचे नाव असून आज नदीला पूर आल्यानंतर दिनेश हा अष्टभुजा मंदिर परिसरात पोहण्यासाठी पाण्यात शिरला आणि वाहून गेला. दिनेशचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू आहे. आज पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट मुंबई हवामान विभागाने दिला आहे. तसेच नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे.

खडकवासला धरणातून विसर्ग कमी

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरीत पावसाचा जोर कमी

रत्नागिरीत रात्रीपासून जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहे. जगबुडी नदी धोका पातळीवर तर गोदावरी नदी इशारा पातळीवर आहे. जगबुडी नदीमधील पाण्याची पातळी 9 मीटर वर तर गोदावरी नदी 5.40 मीटरवर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button