देश -विदेश

राम मंदिराच्या कामाचा वेग एकाएकी मंदावला

अयोध्या: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अयोध्येत आता काहीशा आश्चर्यकारक घटना घडत आहेत. राम मंदिराच्या बांधकामाचा वेग कमी झाला आहे. मजुरांची संख्या एकाएकी कमी झाल्यानं मंदिराच्या कामाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे डिसेंबर २०२४ पर्यंत मंदिराचं काम पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी कामाच्या मंदावलेल्या वेगाची दखल घेतली. राम मंदिराचं बांधकाम करणाऱ्या लार्सन अँड टुब्रो कंपनीला मिश्रा यांनी डिसेंबर २०२४ पर्यंत मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून मंदिराचं बांधकाम धीम्या गतीनं सुरु आहे. या कालावधीत ८ ते ९ हजार मजुरांपैकी निम्मे मजूर काम सोडून गेले आहेत. मंदिरात विविध कामांसाठी ट्रस्टनं जवळपास १०० कंत्राटदार नेमले आहेत. त्यांच्याकडे मंदिर बांधकामांशी संबंधित वेगवेगळ्या योजनांची कामं सोपवण्यात आली आहेत. याच कंत्राटदारांनी विविध कामांसाठी मजूर ठेवलेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या नृपेंद्र मिश्रा यांनी एल एँड टी आणि कंत्राटदारांसोबत अनेक बैठका घेतल्या. मनुष्यबळ कमी पडत असल्याची समस्या दूर करण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी मिश्रा यांच्याशी संवाद साधला. ‘मंदिराच्या कळसाचं काम अतिशय आव्हानात्मक आहे. दुसऱ्या मजल्याचं काम पूर्ण झाल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावरील घुमट तयार झाल्यावरच कळसाचं काम करता येईल. सध्याचा वेग पाहता यामध्ये दोन महिन्यांचा विलंब होऊ शकतो,’ अशी माहिती मिश्रा यांनी पत्रकारांना दिली.

लार्सन अँड टुब्रोला मजुरांची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. २०० ते २५० मजूर न मिळाल्यास डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करणं कठीण होईल. सध्याचा वेग पाहता मंदिराचं काम पूर्ण होण्यास २ महिन्यांचा उशीर होईल. सध्याचा मोसम पाहता मजूर त्यांच्या घरी परतले आहेत त्यांना परत आणताना एल एँड टीला अडचणी येत आहेत, असं मिश्रा म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button