क्राईम

अंत्यविधी आटपून परतताना पती-पत्नीवर काळाचा घाला; दोघांचा जागीच अंत

 जळगाव : नातेवाइकांची अंत्ययात्रा आटपून परत येत असलेल्या पती-पत्नीला ट्रकच्या धडकेत जबर मार लागल्याने दोघं पती-पत्नींचा अपघातात मृत्यू झाला. नातेवाईकांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावून दुचाकीने चाळीसगावकडे परतताना पती-पत्नी ट्रकच्या धडकेत ठार झाले. ही भीषण घटना एरंडोलपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर न्यू इंग्लिश मीडियम स्कूलनजीक शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. अविनाश विजयसिंह पाटील (वय ५८) आणि मीनाबाई अविनाश पाटील (वय ५२) रा. चाळीसगाव असं ठार झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे.

अविनाश पाटील हे चाळीसगाव येथील यशवंत विद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते दुचाकीने पत्नी मिनाबाई पाटील यांच्यासह पिंपळकोठा ता. एरंडोल येथे नातेवाईकांचे निधन झाल्याने अंत्ययात्रेला आले होते. अंत्ययात्रा आटोपल्यानंतर हे दाम्पत्य घराकडे परत जात असताना न्यू इंग्लिश स्कूलपासून थोड्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गवर ट्रक क्रमांक एमएच १८ बिजी १०६६ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मिनाबाई यांच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. तर अविनाश पाटील हे देखील जागीच ठार झाले.

अपघात घडल्याचे पाहून शेतकरी आणि मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एरंडोल पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे.कॉ. राजेश पाटील, संदीप पाटील, शिवाजी पाटील हे लागलीच अपघातस्थळी दाखल झाले. अविनाश पाटील यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, ट्रक चालकाला एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button