Youth Died | ताप आला म्हणून इंजेक्शन दिले, पण युवकाचा जीव गेला; नातेवाईकांचा आक्रोश
डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

परभणी : परभणीच्या जिंतुर (Parbhani Jintur Rain) शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील ताप आलेल्या एका 26 वर्षीय तरुणाचा डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेऊन गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
जिंतुर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राहणारा राजरत्न कैलास वाकळे (26 वर्ष) यास मागील दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या उपचार सुरू केले होते. मात्र त्या तरुणाचा ताप कमी होत नसल्यामुळे त्यास खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नातेवाईकांनी खाजगी डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. पुढील उपचारासाठी परभणी येथे घेऊन जाण्यास सांगितले होते. यावेळी रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला होता.
तरुणाच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मृतदेह खाजगी दवाखान्यासमोर ठेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले होते. यावेळी शवविच्छेदन करून नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून गोंधळ घातला. यावेळी खाजगी डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मोठा जमाव जमला होता. दरम्यान दोन्ही डॉक्टरांवर समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला होता.
डॉक्टरांच्या या कृत्यामुळे गायकवाड कुटुंबीय आणि नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.डॉक्टरांविरोधात तातडीने तक्रार केली शिवाय त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणीदेखील कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


